धुळे दर्पण न्यूज :- परभणी जिल्ह्यातील दलित कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, बीड येथील मस्साजोगच्या सरपंचांची हत्या, आणि राज्यातील जातीय तणाव या विषयांवर शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी मुख्यमंत्र्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
अनिल गोटे यांनी जारी केलेल्या पत्रकात त्यांनी परभणी आणि बीडमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाच्या निष्क्रियतेचा कठोर समाचार घेतला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण – पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
परभणीतील दलित कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालातही हा आरोप सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी "त्याला दम्याचा त्रास होता आणि त्यामुळेच मृत्यू झाला," असे स्पष्टीकरण दिले आहे.
या वक्तव्यावर गोटे यांनी कडाडून टीका करत म्हटले, "पोलिसांच्या मारहाणीत एखादा व्यक्ती प्राण गमावतो, आणि तुम्ही त्याचे समर्थन करता, याचा अर्थ गुन्हेगारांना तुम्ही राजकीय संरक्षण पुरवत आहात."
राहुल गांधींना टीका, पण स्वतः काय केले?
राहुल गांधी यांनी परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सांत्वन केले. यावर मुख्यमंत्र्यांनी टीका करत राहुल गांधींवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला. यावर गोटे म्हणाले, "राहुल गांधी तिथे जाऊ शकतात, तर तुम्ही का नाही? पीडित कुटुंबाचे दुःख समजून घेण्याऐवजी तुम्ही फक्त टीका करत आहात."
![]() |
| - Advertisement - |
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचांची दिवसाढवळ्या हत्या झाली. या घटनेला १६ दिवस झाले तरी मुख्य आरोपींना अटक झालेली नाही. गोटे म्हणाले, "ही घटना गृह विभागासाठी शरमेची बाब आहे. आरोपी मोकाट फिरत आहेत आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे."
मणिपूरची तुलना करून सरकारला सुनावले
गोटे यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत म्हटले, "मणिपूर गेल्या पंधरा महिन्यांपासून पेटले आहे. तिथे महिलांवर अत्याचार होत आहेत, मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना तिथे जाण्याचा वेळ नाही. मग परभणी आणि बीडला जाण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
‘टोळी राज्याकडे वाटचाल’ – गोटेंचा गंभीर आरोप
गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, "मुख्यमंत्र्यांची निष्क्रियता आणि गुन्हेगारांना संरक्षण हे महाराष्ट्राला अराजकतेकडे नेत आहे. हत्याकांडांवर मौन आणि आरोपींना मोकळीक देणे हे टोळी राज्याचे लक्षण आहे."
राजकीय वातावरण ढवळून निघाले
अनिल गोटेंच्या या पत्रकामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोटेंनी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर थेट हल्ला चढवला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

