धुळे दर्पण न्यूज :- 
 महाराष्ट्र आणि मलेशिया यांच्यातील सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र कृषी, पर्यटन आणि व्यापाराच्या क्षेत्रात आघाडीवर असून, या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी सांगितले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे ना. रावल यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी वाणिज्य दूतावासातील मो. स्यारकावी उपस्थित होते. या भेटीदरम्यान ना. रावल यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी वारसा, पर्यटन क्षेत्र आणि व्यापार संधींबाबत माहिती दिली.


महाराष्ट्रातील कृषी उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचणार

  महाराष्ट्र कृषी उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असून, नाशिकचा कांदा आणि द्राक्षे, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, तसेच ताजी फळे आणि भाजीपाला ही उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात.


  "मलेशियामध्ये महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यासाठी मलेशियाने निर्यात वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. महाराष्ट्र सरकार त्यांना सर्व सहकार्य देईल," असे ना. रावल यांनी सांगितले.


पर्यटनाच्या माध्यमातून सांस्कृतिक संबंध दृढ होणार

  महाराष्ट्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, गेटवे ऑफ इंडिया, अजिंठा-वेरूळ लेणी, महाबळेश्वर, माथेरान, गोव्यालगतचा कोकण किनारा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांसारखी अनेक पर्यटनस्थळे विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  "मलेशियाच्या पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट द्यावी, तसेच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मलेशियातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी महाराष्ट्राला भेट द्यावी," असे आवाहन ना. रावल यांनी केले.

मलेशियाच्या सहकार्याची तयारी

  या वेळी महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनीही परस्पर संबंध वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने मलेशियाच्या प्रयत्नांची माहिती दिली.


  "मलेशिया आणि महाराष्ट्र यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारिक संबंध अधिक दृढ होतील," असे त्यांनी सांगितले.


नवे संधी, नवे सहकार्य

  या बैठकीत दोन्ही देशांमधील कृषी निर्यात, पर्यटन विकास आणि व्यापार वाढ यावर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकार आणि मलेशिया यांच्यात भविष्यात सामंजस्य करार (MoU) करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

- Advertisement -
  महाराष्ट्राच्या बांबू, औषधी वनस्पती, दुग्धजन्य पदार्थ, हातमाग उत्पादने तसेच हस्तकला उद्योग यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, यासाठी मलेशियाच्या उद्योग संघटनांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.


संपर्क अधिक बळकट होणार

  या बैठकीनंतर ना. जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्र आणि मलेशियामधील व्यापार व सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत. आगामी काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील."


  महाराष्ट्र आणि मलेशियामधील या नव्या सहकार्यामुळे राज्यातील कृषी, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -