"नळाला मीटर, पाण्याचा हिशोब निश्चित!"
  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमृत २ योजनेअंतर्गत शहरातील प्रत्येक घरगुती नळाला पाणीमोजमाप करणारे मीटर बसविण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांनी वापरलेल्या पाण्याच्या प्रमाणावर शुल्क आकारले जाणार असून, पाणी बचतीला चालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात महिंदळे आणि नगावबारी भागातील सुमारे १५ हजार नळांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

  धुळे महापालिकेने शहराच्या जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आतापर्यंत शहराच्या सुमारे ६० टक्के भागाला दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित भागालाही नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रत्येक नळाला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


  महापालिकेने या योजनेसाठी निविदा प्रक्रियेद्वारे एका खासगी एजन्सीची निवड केली असून, पुढील महिन्याभरात पहिल्या टप्प्यातील १५ हजार मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. शहरातील जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ४० टक्के भागातील नळांनाही मीटर बसवले जाणार आहेत.

"मीटर बसवा, पाणी बचवा!"
एप्रिलपासून मीटरनुसार पाणीपट्टी आकारणी

  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ पासून प्रत्येक घरगुती नळ कनेक्शनवर मीटरनुसार पाणीपट्टी आकारणी केली जाईल. नागरिकांना ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेत पाणीपट्टी भरण्याची सुविधा असेल. सध्या महापालिका पाणीपट्टी कराच्या रूपाने वार्षिक ₹१,६०० आकारते, मात्र मीटर बसवल्यानंतर वापरलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार शुल्क ठरवले जाणार आहे. सरासरी ₹२०० ते ₹२५० दरमहा बिल अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

अवैध नळ जोडणाऱ्यांवर कारवाईची तंबी

  शहरातील अवैध नळजोडण्या रोखण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. अवैध कनेक्शन घेतलेल्या नागरिकांना दंड ठोठावला जाणार असून, प्लंबरांना देखील कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अधिकृत नळजोडणी घेतलेल्या नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने प्रति लिटर ₹७ या दराने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

- Advertisement -
पाणी बचत व आर्थिक नियोजनाचा फायदा

  पाणी मीटर बसविण्यामुळे नागरिकांना पाणी बचतीची जाणीव होईल आणि शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर येणारा ताण कमी होईल. तसेच, नियमित पाणीपट्टी भरण्याची शिस्त लागेल. ही योजना यशस्वी झाल्यास भविष्यात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा अधिक नियोजनबद्ध आणि सुरळीत होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


- सैय्यद सानिल, धुळे दर्पण

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम