धुळे दर्पण न्यूज :- शहरातील पाचकंदील परिसरातील एका लॉजमध्ये राहण्यासाठी थांबलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली होती. त्यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या खटल्याचा निकाल आता धुळे न्यायालयाने दिला असून, चौघांना ९ महिन्यांच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. आर.एस. अडकीने यांनी हा निकाल दिला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
संशयावरून कारवाई, चौकशीत उलगडा
गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी शहरातील पाचकंदील भागातील एका लॉजमध्ये काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्वरित छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे मोहंमद मेहताब बिलाल शेख (वय ४८), शिल्पी बेगम कबीर मुंशी (वय ४३, दोघे रा. चरकंदी, पो. निलुखी, जि. महिदीपूर, बांगलादेश), ब्युटी बेगम मातुबर (वय ४५) आणि रिपा माकोल मातुबर (वय ३०, दोघे रा. बेहेनातोला महिदीपूर, बांगलादेश) अशी सांगितली.
![]() |
| - Advertisement - |
मोबाईल तपासणीतून गूढ उलगडले
पोलिसांनी या चौघांकडील कागदपत्रे व मोबाईल तपासले असता, त्यांनी बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात आझाद नगर पोलिस ठाण्यात परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
८ महिने कारागृहात, अखेर शिक्षा
या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला धुळे जिल्हा न्यायालयात न्या. आर.एस. अडकीने यांच्या न्यायालयात चालू झाला. आरोपींना बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली. अखेर न्यायालयाने चौघांना ९ महिन्यांच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे अटक केल्यापासून हे सर्व आरोपी धुळे कारागृहातच आहेत.
![]() |
| - Advertisement - |
परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू होणार
या आरोपींनी न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केल्याचे समजते. आता शिक्षेची मुदत पूर्ण होत आल्याने, पुढील टप्प्यात त्यांना परत बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासन व परराष्ट्र विभागामार्फत राबवली जाणार आहे.
धुळे शहरात परराज्यातून किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवले जात असून, अशी कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



