घटनेची माहिती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष भगवान पवार यांचे दह्याणे शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातील बांधाजवळ विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. तर शेजारील शेत बापू दावल मोरे यांचे आहे. त्यांचा मुलगा अंकुश हा शनिवारी शेत बांधावर गेला असता त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. अचानक झालेल्या या अपघातामुळे तो गंभीर जखमी झाला.
![]() |
| - Advertisement - |
तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला धुळे येथील हिरे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. सुर्वे यांनी तपासणीनंतर घोषीत केले. या घटनेनंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी पोलिसांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तर रुग्णसेवक गोकुळ राजपुत यांनी मृताच्या कुटुंबियांना तातडीची मदत केली.
दोन महिलांचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू
दरम्यान, धुळे जिल्ह्यात दोन महिलांनी देखील विजेच्या धक्क्याने प्राण गमावले आहेत.
- देवभाने गावातील रत्नबाई खंडू पाटील (वय ६२) यांचा लोखंडी शिडीमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून मृत्यू झाला.
- तर साक्री तालुक्यातील वर्धाने गावातील सीमा सागर शेलार (वय २७) यांचा शेतात तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.
या दोन्ही घटना बुधवारी घडल्या असून, अनुक्रमे सोनगीर व निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![]() |
| - Advertisement - |
वाढती चिंता – शेतकऱ्यांमध्ये भीती
अलीकडच्या काळात जिल्ह्यात विजेच्या धक्क्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शेतकऱ्यांनी आपले शेत व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती विजेचे तारे सोडल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासन व वीज वितरण कंपनीने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणी बापू मोरे यांच्या तक्रारीवरून शेतकरी सुभाष पवार यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


