धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एजंटसह तीन महिलांना जेरबंद केले आहे. या टोळीने अनेक ठिकाणी लग्नाच्या नावाखाली पैसे उकळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
प्रकरण कसे उघड झाले?
अलंकार सोसायटीत राहणाऱ्या तुषार रमेश खैरनार याचे वय वाढल्याने त्याच्या आईने स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला. २१ ऑगस्ट रोजी नागपूर येथील एजंट सचिन मरगडे याच्याशी संपर्क झाला. २५ ऑगस्ट रोजी एजंटसोबत काजल (वय २०) नावाची मुलगी आणि तिची बहीण तुषारच्या घरी आली. मुलीला पाहिल्यानंतर एजंटने लग्नासाठी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तुषारच्या कुटुंबाने १ लाख ३० हजार रुपये रोख व ऑनलाईन दिले आणि एकविरादेवी मंदिरात लग्न लावले गेले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मात्र, अवघ्या दोन दिवसांत काजलच्या वागणुकीवर संशय आल्याने तुषारने तिची पडताळणी केली. काजल विवाहित असल्याचे व तिचा एक लहान मुलगा असल्याचे पुरावे समोर आले. त्यामुळे तुषारने पोलिसांकडे धाव घेतली.
![]() |
| - Advertisement - |
सापळा आणि अटक
१ सप्टेंबर रोजी चाळीसगाव रोड पोलिसांनी तुषारला सांगून एजंट सचिन मरगडे, काजल, तिची बहीण नेहा आणि पुनम (उज्जैन येथील) यांना चाळीसगाव रोड चौफुली येथे बोलावून घेतले. पोलिसांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. चौकशीत त्यांनी अनेक तरुणांना लग्नाच्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळल्याची कबुली दिली.
गुन्हा दाखल
तुषार रमेश खैरनार यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरु असून या टोळीच्या इतर गुन्ह्यांचा छडा लावला जात आहे.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा
ही कारवाई पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात असून लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


