जळगाव । प्रतिनिधी
वक्फ सुधारणा कायदा २०२५ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदींना तात्पुरती स्थगिती दिली असली तरी संपूर्ण कायद्याला स्थगिती न दिल्यामुळे मुस्लिम समाजात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशभरात संविधानिक चौकटीत शांततापूर्ण आंदोलनाची रूपरेषा आखली आहे.

त्याअंतर्गत शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुस्लिम समाज व संविधानप्रेमी बांधवांनी व्यवसाय बंद ठेवावा, असे आवाहन वक्फ समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी व मुख्य समन्वयक डॉ. अब्दुल करीम सालार यांनी केले.

- Advertisement -

शनिवारी (२० सप्टेंबर) जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या वेळी सुहैल अमीर, सैय्यद अयाज अली, मौलाना मुझम्मील नदवी, डॉ. राघिब जहागीरदार आदींसह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

आंदोलनाची रूपरेषा
पत्रकार परिषदेत बोलताना नदवी व सालार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालात काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली असली तरी संपूर्ण वक्फ कायद्यास स्थगिती न देणे निराशाजनक आहे. त्यामुळे २६ सप्टेंबरला ‘व्यवसाय बंद’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच बिगर मुस्लिम बांधवांशी संवाद, धरणे, रॅली आदी संविधानिक मार्गाने शांततेत आंदोलन ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.