धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील देवपूरमधील नकाणे रोड परिसरात स्थित एकता नगर येथील मुख्य रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी जोर धरू लागल्या आहेत. या संदर्भात परिसरातील रहिवाशांनी धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
एकता नगरमधील सुमारे १२ मीटर रुंदीच्या आणि १५० मीटर लांबीच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण सध्या सुरू असून, त्याचे कार्पेटिंगचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र नागरिकांचा आरोप आहे की, या कार्पेटिंगच्या कामात कुठल्याही दर्जात्मक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही. डांबरी थर अत्यंत पातळ व सैल असून, काही ठिकाणी हाताने उकरले जाईल इतका कमजोर आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
![]() |
| - Advertisement - |
विशेष म्हणजे, सदर रस्ता मागील तीन ते चार वर्षांपासून मंजूर असूनही संबंधित ठेकेदाराने या कामास यंदाच्या पावसाळ्यातच सुरुवात केली. त्यामुळे रस्त्याचे काम अधिकच खराब झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसात काम केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ता बांधकाम झाले असून, याची तपासणी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या तक्रारीवर सह्या करणाऱ्यांमध्ये भूषण पाटील, राजेंद्र मोरे, सागर खैरनार, अशोक भोकरे, डी.ए. सैंदाणे, डॉ. अमोल किनगे, दीपक हालोरे, रवींद्र चौधरी, कुणाल शिंगाणे, नितीन भोकरे, महेश मोरे, मंगला भावसार, स्वाती भावसार, मिलिंद लोंढे, सागर व्यास यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश आहे.
या प्रकारामुळे एकूणच महानगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शहरात विकासकामांमध्ये दर्जा आणि पारदर्शकता राखली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत तांत्रिक विभागाला चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले असून, लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत.


