३९२ कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवास वेळ होणार केवळ अर्धा तास; उद्योग-व्यवसायाला चालना

  धुळे दर्पण न्यूज :- मुंबई-आग्रा महामार्गाला आणि गुजरात राज्याला थेट जोडणारा तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा दोंडाईचा–विखरण–कामपूर–मेथी–चिमठाणे–डांगुर्णे–सोंडले–सोनगीर या सुमारे ३९२ कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील लेयर कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला.

  या ३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असून, त्यामुळे दोंडाईचा ते सोनगीर दरम्यानचा प्रवास वेळ केवळ अर्ध्या तासावर येणार आहे. नागरिकांमध्ये यामुळे समाधानाची लाट पसरली आहे. आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून या रस्त्याला मंजुरी मिळालेली असून, गेल्या काही महिन्यांपासून कामाला वेग मिळाला आहे.

- Advertisement -

  शुभारंभ प्रसंगी मंत्री रावल म्हणाले, “हा रस्ता केवळ विकासाचा मार्ग नाही, तर या भागाचा भाग्यविधाता ठरणार आहे. रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होऊन मुंबईसारख्या शहरांपर्यंत केवळ साडेपाच तासांत पोहोचता येणार आहे. यामुळे उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील.”

  त्यांनी पुढे स्पष्ट केले की, कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही. रस्ता दीर्घकाळ टिकून राहावा, यासाठी सर्वाधिक दर्जाच्या साहित्याचा वापर केला जाईल. “या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेनंतर धुळे जिल्ह्याचा विकास आणखी झपाट्याने होईल,” असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या दर्जाचे काम

  या प्रकल्पांतर्गत एकूण ३६ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण होऊन तो १० मीटरचा होणार आहे. त्यातील ७ मीटरचा मुख्य मार्ग पूर्णपणे काँक्रीटचा असेल. तसेच, या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी ९ बसस्थानके, १ मोठा पूल, १५ लहान पूल, १ ब्रिज-कम-बंधारा तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मजबूत काँक्रीट गटारे बांधण्यात येणार आहेत. या सर्व कामांचा दर्जा समृद्धी महामार्गाच्या प्रमाणावर ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

  या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, चंद्रकांत सोनार, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, मुंबई बाजार समितीचे संचालक जिजाबराव पाटील, रावसाहेब गिरासे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक बागल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे, मनीष वाघ, संजय सूर्यवंशी, हेमंत गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे केवळ प्रवास वेळ कमी होणार नाही, तर परिसरातील आर्थिक, सामाजिक विकासालाही नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -