धुळे शहरात पाण्याच्या टाक्यांची अखेर प्रत्यक्षात सफाई; नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा दिलासा

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीयुक्त, सांडपाण्याचे मिश्रित पाणी नळांद्वारे मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. या संदर्भात लोकसंग्राम अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा प्रमुख जाहिद हुसेन गुलाम कादिर यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांकडे वारंवार निवेदने दिली. अखेर महापालिकेने जाग येऊन शहरातील सर्व ४० पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेसाठी टेंडर काढले आणि सफाईचे काम सुरू केले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

३० वर्षांपासून फक्त कागदावरच होत होती टाक्यांची स्वच्छता!

शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील मोठी सिमेंटची पाण्याची टाकी तब्बल ३० वर्षांपासून प्रत्यक्षात कधीच साफ झाली नव्हती. केवळ कागदावरच सफाई दाखवली जात असल्याचे उघड झाले आहे. टाकीमधील पाणी रोखण्यासाठी वापरला जाणारा ‘वाल्व्ह’ देखील ३० वर्षांत कधीच ऑपरेट केला नव्हता. त्यामुळे टाकीत अनेक टन गाळ, मृत प्राणी, किडे साचून राहिले होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्रामाणिक पुढाकारामुळे बदल

महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नवनीत सोनवणे यांच्या पुढाकारामुळे अखेर ही स्वच्छता प्रत्यक्षात होत आहे. गेल्या दोन दिवसांत श्रीराम पेट्रोल पंपाजवळील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम आता १०० टक्के पूर्ण झाले आहे. जुन्या गंजलेल्या नट-बोल्ट कटरने कापून काढण्यात आले असून, तब्बल एक डम्परभर गाळ बाहेर काढण्यात आला.

- Advertisement -

टाक्यांच्या सफाईसोबतच आणखी महत्त्वाच्या उपाययोजना आवश्यक

शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन्समध्ये ठिकठिकाणी गळती असल्यामुळे सांडपाणी पाईपमध्ये मिसळून घाण पाणी नळांमधून येत असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तसेच हनुमान टेकडीवरील फिल्टर प्लांटमध्ये मोठी भोकं पडल्यामुळे नद्यांमधील दुषित पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचेही निदर्शनास आले.

या संदर्भात जाहिद हुसेन यांनी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या होत्या:

  • पाण्यात पावडर टाकली जाते की नाही, याची समितीद्वारे चौकशी करावी.
  • प्रत्येक टाकीवर स्वच्छतेची तारीख नमूद करणारे फलक लावावेत.
  • पाईपलाईनच्या गळती तातडीने दुरुस्त कराव्यात.
  • हनुमान टेकडीवरील फिल्टर प्लांटमधील भोकं बुजवावीत.
- Advertisement -

नागरिकांत समाधानाची भावना

या कामामुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि समाधानाची भावना दिसून येत आहे. “पूर्वी केवळ कागदावरच स्वच्छता दाखवली जात होती, आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात काम सुरू आहे. शुद्ध पाणी मिळाल्यास नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होईल,” असे जाहिद हुसेन यांनी सांगितले.

महानगरपालिकेने उर्वरित पाण्याच्या टाक्यांचीही तातडीने सफाई पूर्ण करून, पाईपलाईनच्या गळती दुरुस्त कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे, जेणेकरून धुळेकरांना अखेर शुद्ध व सुरक्षित पाणी मिळू शकेल.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम